Monday, 11 July 2016

जावळीच्या निसर्गलंकेचे विजयपर्व.....!!!

हिंदवी स्वराज्य !!! शिवछत्रपतींच्या जनमानसास भोवून टाकणाऱ्या लढवय्या व प्रेरक आयुष्याच्या कर्मगाथेच्या भागीरथीचा उगम ह्या दोन शब्दांत दडलेला आहे.हिंदवी स्वराज्य नावाच्या हिमनगातून निघणारा निर्मल जलप्रवाह पुढे विशालकाय भागीरथीचे रूप घेऊन गुलामीच्या साखळदंडाने जखडलेल्या भारतीयांची न्याय,सुबत्ता,शांती,सुख व संपन्नतेची तहान शमवणारे स्वप्नचित्र इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभे करतो.शिवचरित्राचे मनन-चिंतन आत्म्याविश्वात सुरु झाले की अत्याचाराने पिडलेल्या,दबल्या-दबल्या-पिचल्या समाजासाठी जणू समग्र कल्याणाची भागीरथी मागे घेऊन समोर धावणारे शिवछत्रपती त्रैलोक्यमंडळ हलवून टाकण्याइतके उत्साहाचे भरते देऊन जातात.

हिंदवी स्वराज्यस्थापनेचे आयाम आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा ऐतिहासिक,सामाजिक तसेच पौराणिकदृष्ट्या फार मोठे आहेत.सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार सुरु असलेल्या कलीयुगामध्ये म्लेंच्छचेच अधिराज्य होईल,अत्याचार,अनाचार,अनीती व अधर्माचे अवडोंबर चहूदिशांनी पसरेल अशी काही "पुराणे?" वर्णन करतात.वेद,उपनिषद किंवा महाभारतात कलियुगाची कल्पना रंगवलेली नसली तरीही वायू,गरुड किंवा लिंगपुराणामध्ये कलियुगाचे अत्यंत निराशावादी चित्र रंगवलेले आपल्याला दिसून येते.निराशावादी विचारांचा दुष्प्रचार काही पुराणांच्या(?) माध्यमातून झाल्याने वा त्याचे चुकीच्या पद्धतीने विवेचन केले गेल्यामुळे निष्क्रियतेची छाया शिवपूर्वकाळात संपूर्ण समाजावर पसरली होती.जातीवर्णभेदासोबातच धर्म नावाच्या विचारशक्तीसोबत रूढ झालेल्या अशा बुरसट संकल्पना सज्जनांच्या निष्क्रियतेच्या कारण बनल्या.विश्वकल्याणाचे अमृत देणाऱ्या हिंदू धर्माच्या ग्रंथांचे व संदेशांचे तार्किक विवेचन न होता धर्मकपिलेच्या अंगास चिकटलेले काही गोकरूही आपण रुद्राक्ष समजून पूज्य मानले.विश्वाच्या अंतरंगात टिकून राहण्यासाठी जसे प्रत्येक भौतिकी वस्तू,समाज व विचाराला परीवर्तनशीलतेची गरज असते तसेच धर्मही परिवर्तनशीलतेच्या चक्रव्यूहातून मुक्त नाही.एकीकडे पापशक्ती व अनाचार कलियुगात वाढीस लागणार,आता आशा,प्रेरणा,शांती व सुखास जागा नाही अशी पोपटपंची करणारे स्वघोषित "धर्मपंडित" हिंदू समाजाला निराशावादाच्या तळ नसलेल्या विहिरीत ढकलण्याचे काम जणू त्यांना श्रीविष्णूनेच प्रगट होऊन स्वप्नसाक्षात्कार दिला आहे अशा उत्साहाने करत असताना शिवछत्रपतींचे "हे राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे" असे साक्षात सरस्वतीबोल धर्माच्या नावाखाली रूढ झालेल्या चुकीच्या संकल्पनाना छेद देतात आणि धर्मही परिवर्तनशील असू शकतो ह्या दाव्यास चुकीच्या रूढींना धक्का देऊन हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेने बळ देतात.देवत्वाचा कारुण्यमय अंश प्रत्येक मानवदेही वसतो अशी आपली हिंदूधर्मीयांची श्रद्धा आहे.छत्रपतींच्या मुखाद्वारे बाहेर पडलेली ही देववाणी ह्याच देवत्वाच्या अंशाचे प्रतिक आहे.हाच प्रत्येकाच्या ठायी वसणारा देवत्वाचा अंश आपल्याला धर्माच्या संदेशांमध्ये काळ व परिस्थितीरूप बदल करण्याचा अधिकार देतो.धर्म नावाचे "पुष्पक' विमान हे नेहमी आशावादाच्या वैकुंठाकडे प्रवास करते निराशावादाच्या नरकसाम्राज्याकडे नाही असा विचार दृढ करूनच धर्मावर श्रद्धा ठेवा.धर्म नावाचा विचार डोळे बंद करून मनन करण्यासाठी नव्हे तर उघड्या डोळ्यांनी अर्जित करण्याकरिता आहे हे सदैव ध्यानी असू द्या.हिंदवी स्वराज्यस्थापनेचे ऐतिहासिक,सामाजिक व पौराणिक आयाम अजून सखोलतम अभ्यासाने समजावून घ्या.

इ.स.१६५५ साली शहाजीराजांची रवानगी पुन्हा कर्नाटक प्रांतात झाली आणि ६ वर्षांपासून शिवछत्रपतींची स्वराज्यविस्ताराच्या आघाडीवर होणारी कुचंबणा थांबली.छत्रपती श्रीरामसेनेने रामसेतू बांधताना दाखवलेल्या उत्साहाच्या तोडीस तोड उत्साहाने स्वराज्यविस्ताराचे आराखडे बांधू लागले.शहाजीराजे कर्नाटकात रवाना होताच छत्रपतींची नजर हिंदवी स्वराज्याच्या दक्षिण-पश्चिमेस असलेल्या दुर्गम,दुर्घट पण नैसर्गिक संपन्नतेची कुबेरनगरी असलेल्या जावळी प्रांतावर येऊन खिळली.जावळीचे मोरे घराणे आदिलशाहीचे पिढीजात मातब्बर वतनदार होते.८-१० पिढ्या सत्ताविलास भोगून अकुत धनसंपत्तीचे धनी झालेल्या मोऱ्यांचा मुलुखही थोडाथोडका नव्हता.महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी मुलुख तसेच बव्हंशी सुभे सातारा मोऱ्यांच्या अधिपत्याखाली होता.सह्याद्रीच्या निसर्गसाम्राज्यात मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे मोऱ्यांची जावळी वाईचा सुभा,सह्याद्रीविश्व व पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर बळाच्या अधिकाराने अधिसत्ता गाजवत होती.जावळीचे महत्व हेरूनच दूरदृष्टीने शिवछत्रपतींनी इ.स.१६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या कृष्णाजी बाजी चंद्ररावास विजापूरच्या नाराजीचा धोका पत्करून नुसत्या जावळीच्या सिंहासनावर नव्हे तर एकप्रकारे शक्तीतख्तावर बसवले.शिवछत्रपतींची जावळी मोहिमेची समरगाथा ग्रहण करण्याआधी जावळी स्वारीची पार्श्वभूमी अर्जित करणे अगत्याचे आहे.कृष्णाजी बाजी चंद्ररावावर निकडीच्या समयी केलेल्या उपकारक कृत्यामुळे चंद्रराव स्वराज्याचे सवंगडी होतील आणि हिंदवी स्वराज्यवृक्ष संवर्धन व वाढीस मोऱ्यांच्या सहकार्याचे खतपाणी लाभेल अशी छत्रपतींची अपेक्षा होती.परंतु क्लिष्ट,चंचल मनुष्यस्वभावाचे उत्तम उदाहरण पेश करून चंद्रराव मोऱ्याने लवकरच महाराजांशी उघडपणे शत्रुत्व आरंभिले.चंद्ररावाची मोरे घराण्याच्या वैभववृद्धीची महत्वाकांक्षा उपकारांच्या मर्मबंधांना चिरडून हिंदवी स्वराज्याच्या क्रांतीसूर्यास राहूकाळाचे ग्रहण लावण्याचे वेध घेऊ लागली.मोऱ्यांच्या गादीवर ताख्नाशीन झाल्यावर चंद्ररावाची मनस्थिती पालटल्यामुळे उदयोन्मुख व वर्धिष्णू हिंदवी स्वराज्यसत्तेचे अभिमानी व अहंकारी मोऱ्यांच्या सत्तासंग्रहाशी खटके उडण्यास सुरुवात झाली.


कृष्णाजी चंद्ररावाने आपली आदिलशाहशी अखंडित निष्ठा जाहीर करून जुलूम-जबरदस्ती करण्यास सुरुवात केली व चंद्ररावाचे शिशुपालप्रताप गुन्हे स्वराज्यकार्यात हरतऱ्हेने अडथळा आणण्याचा प्रयत्न करू लागले.मोऱ्यांचे बळही थोडेथोडके नव्हते.१०-१२ हजार मातब्बर फौज पदरी होती तसेच परंपरागत सत्ताउपभोगाने जावळीची मोऱ्यांची मसनद प्रचंड सामर्थ्याची धनी झाली होती.हातातील सत्तासूत्राच्या बळकटीनेच शिरजोर झालेला चंद्रराव आता उपकारकर्त्याचेच सत्तासमीकरण बिघडवण्याचे स्वप्न बघत होता. बिरवाडी भागातील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटलांकडे होता,पण चंद्ररावाने सत्तालालसेने ग्रहित होऊन फौजेबळाने त्यांना हुसकावून लावले व ती गावे स्वतः बळकावली.चंद्ररावाच्या शकुनी अन्यायाने परागंदा झालेले बाजी व मालोजी इ.स.१६५१-५२ च्या सुमारास महाराजांच्या आश्रयास आले व त्यांनी महाराजांना त्यांच्यासोबत न्याय करण्याची विनंती केली.निव्वळ सत्तालोलुपतेमुळे चंद्ररावाने गावे बळकावल्याचे लक्षात घेऊन महाराजांनी बाजी व मालोजी पाटीलांची हिंदवी स्वराज्यसमर्थनाने गावांच्या अधिकारावर पुनर्स्थापना केली आणि पुढे जाऊन हिंदवी स्वराज्य-मोऱ्यांच्या संघर्षवणव्याचे रूप घेणारी पहिली ठिणगी पडली.स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला व छत्रपतींच्या न्यायदंडकास घाबरून प्राणभयाने तो चंद्ररावाच्या आश्रयास आला.चंद्ररावानेही अकारण स्वराज्यास वाकुल्या दाखवायची अभिलाषा धरून रंगो त्रिमलास अभयदान दिले व छत्रपतींचा रोष ओढवून घेतला.हिंदवी स्वराज्याच्या प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत चाललेल्या स्वप्नवत वैभवाने चिंतीत होऊन चंद्ररावाने थेट आता स्वराज्यावर आक्रमणाचे शस्त्र उगारले.चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्ररावाचे कर्ण-अर्जुनाप्रत हाडवैर होते.पुढे वैरभावातूनच बलदंड राजसत्तेचा मनमानी वापर करून चंद्ररावाने रामाजीस ठार केले.रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने स्वराज्याच्या हद्दीत येणाऱ्या रोहिडखोऱ्यातील पलसोसी गावास आश्रयी आला तेव्हा चंद्ररावाने लुमाजीचा पाठलाग करीत उघडपणे स्वराज्यात घुसून लुमाजीची हत्या केली.स्वराज्यास हरप्रकारे नारमोहम करण्याची अढी पक्की मनात बांधून बसलेला चंद्रराव आता बळासोबतच भेदनीतीच्या आकडीनेही हिंदवी स्वराज्याचे सौंदर्यविश्व व संघटीत स्वराज्यशक्ती छीन्नविछीन्न करण्याचा प्रयत्न करू लागला.गुंजणमावळच्या देशमुखीबद्दल शिंदे-शिलिमकर व चोरघे यांचा तंटा होता.हिंदवी स्वराज्याच्या सत्तापर्वात शिलिमकरांचा पक्ष दुर्बळ तर बळजोरीने चोरघे शिरजोर होऊन गुंजणमावळच्या देशमुखीवर आपला हक्क सांगू लागले.खेडेबाऱ्याच्या कोंडे-देशमुखांनीही आयत्या जळीत सरपणावर भाकऱ्या भाजण्यासारखे प्रताप करून गुंजणमावळच्या देशमुखीवर आपला मालकीहक्क सांगण्यास सुरुवात केली.परंतु गुंजणमावळच्या देशमुखीच्या अधिकारसंघर्षात सर्व दावेदारांवर संधिसाधू धूर्तशिरोमणी चंद्ररावाने वरचढ ठरून घाटावरील देशमुखी मोऱ्यांचीच असल्याचे जाहीर केले.गुंजणमावळच्या सत्तासंघर्षात महाराजांनी शिलिमकरांचा पक्ष उचलून धरला.शिलिमकर स्वराज्याचे एकनिष्ठ सरदार होते.फतहखानाचे आक्रमण स्वराज्यावर झाले असता शिलिमकरांनी प्राणपणाने लढून स्वराज्यसेवेचे कर्तव्य पर पाडले होते.शिलिमकर हे स्वराज्याचे शिलेदार असले तरी जावळीच्या मोऱ्यांशी त्यांचा रक्तसंबंध होता.चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा होते.महाराजांच्या पक्षाचे दावेदार असलेल्या शिलिमकराना चंद्ररावाने रक्तसंबंधांचे फासे वापरून विचलित करण्यास सुरुवात केली.महाराज तुमचे अहित चिंतितात,तुमच्या वकुबाचा वापर करून पुढे स्वतः महाराज गुंजणमावळची देशमुखी बळकावतील अशा कलीचा संचार चंद्ररावाने काही लोकांकरवी शिलिमकरांच्या मनात केला.चंद्ररावाच्या भेदयुक्तीने भ्रमित होऊन शिलिमकरांनी चंद्ररावाची कास धरली व शिलिमकर “शकजादे” झाले.महाराजांना झाल्या प्रकाराचे यथासांग इतिवृत्त कळताच शिलिमकरांसारखे इमानी स्वराज्यसेवक भ्रमित झाल्याचे बघून अस्वस्थ झालेल्या महाराजांनी शिलीमकरांना इ.स.१६५५ मध्ये तातडीचे अभयपत्र रवाना केले.हैबतराव शिलिमकरांना महाराजांनी महादेवाची व आऊसाहेबांची आण घेऊन पुन्हा विश्वासात घेतले व स्वराज्यसूत्रात बांधले.मस्तवाल,शिरजोर मोऱ्यांच्या हरामखोरीने झाल्या प्रकरणात डीचवल्या गेलेल्या महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले.मोऱ्यांची स्वराज्यातील लुडबुड व बदअंमल थांबला नाही तर जावळी मारून चंद्ररावास कैद करण्याची चेतावनीही दिली,पण मद्याच्या नशेने मदमस्त झालेल्या गजाप्रमाणे सत्तेचा व बळाचा सोमरस आकंठपणे उपभोगीत करून मस्तवाल झालेल्या चंद्ररावाने “तुम्ही राजे काल जाहला.तुम्हास राज्य कोणे दिधले?मुस्तकद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो?येथे उपाय कराल तर तो अपाय होईल.यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल” असा उर्मट व उन्मत्तपणाचा जवाब महाराजांना दिला.सामोपचाराचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाराजांनी चंद्ररावास अखेरचे निर्वाणीचे पत्र लिहिले.शरण येण्याचा पर्याय स्वीकारून भविष्यात होऊ घातलेला रक्तपाताचा युद्धअध्याय टाळायची संधी महाराजांनी मोऱ्यांना देऊ केली.शरण न आल्यास “मारले जाल” अशी सुस्पष्ट व खुली चेतावनीही दिली,पण आपल्याच राजसत्तेच्या धुंदीत असलेल्या चंद्ररावाने महाराजांना झिडकारले व हिंदवी स्वराज्य-जावळीसत्ता संघर्षवणव्याने पेट घेतला.


सामोपचाराने आता प्रकरण मिटत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असल्याने अंगात रणचंडीचा संचार झालेल्या शिवछत्रपतींनी जावळी स्वारीची जोरकस तयारी आरंभली.शहाजीराजे तसेच वाईचा सरसुभेदार अफझलखानाची मोठ्या फौजेसाहित कर्नाटकात रवानगी झाल्याने आदिलशाही दरबाराचे सारे लक्ष दक्षिणेवर खिळले होते.त्यातच मुहम्मद आदिलशाह गंभीर दुखण्याने शेवटच्या घटका मोजत असल्याने आदिलशाही दरबारात अनोगांदी व गोंधळाचे वातावरण होते.सर्वदूर परिस्थितीचा माग घेऊन मोऱ्यांच्या कुमकीस कोणीही येणार नाही ह्याची खातरजमा होताच महाराज जावळीची निसर्गरूपी सुवर्णलंका सर करण्याच्या उद्योगास लागले.६ वर्षांच्या चढाया-लढायांच्या दुष्काळाने झुंजीसाठी आतुरलेले सरदार-दरकदार व मावळे जावळीस्वारीत पराक्रमाचे डोंगर उभे करण्याचा निर्धार करून लागले.चंद्ररावाचे प्रमुख कारभारी व सैन्य जावळीच्या जोहोरबेट,चतुर्बेट,सिवथर खोरे व खुद्द जावळी अशा ठिकाणी विखुरलेले होते.रघुनाथ बल्लाळ सबनीस,संभाजी कावजी कोंढाळकर,सूर्यराव काकडे,कान्होजी नाईक जेधे,बांदल देशमुख,शिलिमकर देशमुख इ. मातब्बर सरदारांस नामजाद करून जावळी मोहिमेची सूत्रे दस्तुरखुद्द महाराजांनी हातात घेतली.सुनियोजितपणे संभाजी कावजी कोंढाळकराने चतुर्बेटावर,रघुनाथ बल्लाळ सबनिसांनी जोहरखोऱ्यावर तर सूर्यराव काकडे,जेधे,बांदल,शिलिमकर इ. या मातब्बर सरदारांनी खुद्द जावळीवर हल्ला केला.जावळीची अहंकारी व अभिमानी अधिसत्ता नव्याशिक्या पण सामर्थ्यशाली,बलदंड,उत्साह व शौर्याचा खळखळता समुद्र सदेही धारण करणाऱ्या हिंदवी स्वराज्याशी निकराचे संग्रामयुद्ध करू लागली.चंद्रराव मोऱ्यांकडून प्रतापराव मोरे,हणमंतराव मोरे हे भाऊबंद,बाबाजीराऊ हा कारभारी व मुरारबाजी देश्पांड्यासारखा पराक्रमी सेनानायक मोरे घराण्याच्या सत्ताअस्तित्वासाठी निकराची झुंज देऊ लागला.नवनिर्माणाच्या प्रेरणेतून व अत्याचाराच्या अग्निदाहात निर्माण झालेल्या राखेतून पुनर्जन्म घेणाऱ्या हिंदवी राजमनाच्या आत्यंतिक त्वेष,निर्धार व पराक्रमासमोर मोऱ्यांचे समर्थबळ तोकडे पडू लागले.चतुर्बेट कावजी कोंढाळकराच्या हाती पडले,जोहरखोरेही रघुनाथपंतानी काबीज केले.हणमंतराव मोरे युद्धपर्वाच्या संगरतांडवात मारला गेला,तर प्रतापराव मोरे विजापुरास पळून गेला.खासा चंद्रराव व मुरारबाजीने बराच काळ जावळी लढवली,पण हिंदवी स्वराज्याच्या तळपत्या क्षात्रतेजासमोर जावळीचे शक्तीवैभव फिके पडले.चंद्ररावास सपशेल माघार घ्यावी लागून तो कुटुंबकबिल्यासह प्राणभयाने बलदंड रायरीच्या आश्रयास गेला.चंद्ररावाच्या पलायनाने जावळी महाराजांच्या ताब्यात आली आणि मन्मथ नाम संवत्सर शके १५७७ पौष वद्य चतुर्दशीस (इ.स.१५ जानेवारी १६५६) जावळीवर हिंदवी स्वराज्याचे पवित्र निशाण डौलाने फडकू लागले.


बघता बघता इवलेसे भासणारे हिंदवी स्वराज्य सामर्थ्य,बलिदान व पराक्रमाच्या तपोबळावर पादशाही सत्ताविश्व नभआक्रमणाने झाकोळून टाकायचे आव्हान देऊ पाहत होते.जावळी सर केल्यावर जावळीची सुभेदारी कृष्णाजी बाबाजी ह्यास तर वीरो रामास मुजुमदारी देऊन महाराजांनी जावळीची व्यवस्था लावली.जावळीची व्यवस्था लागताच चंद्ररावाचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी जातीने किल्ले रायरीकडे दरकूच करण्याचा निर्धार केला..अजिंक्यत्वाचे प्रतिक असलेल्या रायरीला आपल्या निर्धाराच्या आत्मबळासमोर झुकवून रायरीच्या अजिंक्यत्वाचे हरण करण्याचा मानस मनी धरून महाराज इ.स.३० मार्च १६५६ रोजी रायरीकडे कूच झाले.इ.स.६ एप्रिल १६५६ रोजी शिवछत्रपती रायरीच्या पायथ्याशी पोहोचताच स्वराज्याच्या शिलेदारांनी रायरी काबीज करण्याचा निकराचा प्रयत्न आरंभला.इरेस पेटून चंद्ररावानेही महिनाभर रायरी लढवला पण त्याचे बळ अपुरे होते.शेवटी हैबतराव व बाळाजी नाईक शिलिमकरांच्या मध्यस्थीने रायरी महाराजांच्या स्वाधीन करून चंद्रराव महाराजांस शरण आला.हिंदवी स्वराज्यास धुळीस मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या चंद्ररावाचे पुढे काय करावे ह्या विवंचनेत छत्रपती सापडले होते. एकीकडे चंद्ररावास स्वराज्यधारेत शामिल करून वाल्याचा वाल्मिकी करावा की त्याच्याहातून घडलेल्या गुन्ह्याखातर त्यास कडक शासन करावे असा अहोरात्र महाराजांचा खल सुरु होता तर दुसरीकडे नुकताच वर्धिष्णू हिंदवी स्वराज्यात दाखल झालेला किल्ले रायरी उर्फ “रायगड” छत्रपतींच्या पराक्रम व कर्तुत्वाने नतमस्तक होऊन त्यांची पायधूळ आपल्या मस्तकी लेवून जीवन कृतार्थ झाल्याच्या हर्षोल्हासाने दिमाखात हिंदवी स्वराज्यवैभवाकडे कौतुकाने बघत होता.

जय भवानी !!!! जय शिवराय !!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती.  


 

No comments:

Post a Comment