Friday, 1 July 2016

हिंदवी स्वराज्याचा समुत्कर्ष

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यस्वप्नाचे सार असलेले शिवचरित्र हे अत्यंत रोमहर्षक,प्रेरणादायी व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणारया मनुष्याला कर्तुत्वाची तसेच विचारांची नवी डोळस दृष्टी देणारे एक परीसकाव्य आहे.शिवचरित्रात शिवछत्रपतींच्या आयुष्यातील विविध घटनांचे वर्णन करताना शब्दसंपदेचे अमृतकुंभ ओसंडून वाहू लागतात.शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यनिर्मितीच्या समरगाथेतील एक एक घटना आत्म्यास परमतेजाची प्राप्ती करवणाऱ्या नैतिक आत्मबळाचे वरदान नकळतपणेच आपल्याला देऊन जाते.”शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |” ह्या समर्थांच्या गूढ व सार्थक उपदेशाचें अविरतपणे पालन करूनच देव,देश अन धर्माची पताका आपण अवघ्या विश्वात उंचावू शकू.शिवछत्रपतींच्या सद्गुणांचा दैवी अंश आपण आपल्या अंतरंगात सामावून घेतला तर विश्वाच्या अटकेपार झेंडे रोवणे आपणास कठीण नाही.

ज्ञान,तेज,बल,कर्म,नीती,धर्म,सत्य,दया,शील,पराक्रम व कर्तुत्वाची फळप्राप्ती देणारा कल्पवृक्ष आपल्या आत्म्याच्या स्वप्नआकाशात शिवचरित्राचे बीज पेरल्यानेच अंकुरित होऊन फोफावणार आहे.शिवचरित्राच्या तेजोवनात भटकंती करताना छत्रपतींच्या कर्तुत्वाने जसे मन भारावून जाते तसे जगातील सर्व हिरे-माणके व धनसंपत्तीहून मूल्यवान असलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रमी सरदारांनी वेळेवेळी दाखवलेला अतुलनीय पराक्रम,समर्पण भाव वा प्रसंगी दिलेले सर्वोच्च बलिदान आत्म्यास हेलावून टाकते.डोळ्यांसमोर उभा राहतो तो नुकत्याच अंकुरित झालेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी पुरंदरपर्वात बाजी पासलकरांनी दिलेला प्राणांत लढा,अफझलखान नावाच्या जहरी सर्पाचा विषज्वर ताप देत असतानाही अफझलस्वारीच्या प्रसंगी कान्होजी नाईक जेध्यांनी दाखवलेली प्रखर स्वामीनिष्ठा,हा-हा म्हणता थेट छत्रपतींवर हल्ला करून स्वराज्याचा अश्वमेध रोखू पाहणाऱ्या सय्यद बंडास नरकपुरीचे दर्शन घडवणाऱ्या जीवा महालाचे प्रसंगावधान,स्वराज्याचा श्रीकृष्ण सिद्दी जौहर नावाच्या कंसकैदेतून व यवनांच्या यमुनापुरांतून सुखरूप सुटून जावा म्हणून शिवा काशीदने पत्करलेले हौतात्म्य,”बाजी तर लाख होतील,पण लाखाचा पोशिंदा शिवबा मात्र एकच आहे” ह्या पराकोटीच्या पावन विचाराने छत्रपतींच्या रक्षणासाठी शर्थीने गजापुरची पावनखिंड लढवणाऱ्या बाजीप्रभूंचा भीमपराक्रम,छत्रपतींच्या आग्र्याच्या काळकैदेतून सुटकेनंतर पकडल्या गेलेल्या रघुनाथपंत कोरड्यानी यातनांच्या नरकवासात हिंदवी स्वराज्यस्वप्नासाठी दाखवलेली सहनशीलता,कर्तव्यास सर्वोच्च मानून ऐन पोराच्या लगीनघाईत महत्प्रयासाने कोंढाण्यास काबीज करणाऱ्या तानाजीने सिंहाच्या काळजाने पराक्रमाच्या यज्ञवेदीवर जीवनाची आहुती देऊन केलेले सर्वोच्च बलिदान,अवघ्या ७० मावळ्यानिशी सूर्याच्या तेजाने अन राहूच्या चालीने बलदंड पन्हाळ्याचा पाडाव करणाऱ्या कोंडाजी फर्जन्दाची बुद्धीकुशलता,छत्रपतींचे शब्द मनावर घेऊन “वेडात मराठे वीर दौडले ७” ह्या उक्तीचे जनक असलेल्या प्रतापराव गुजरांनी स्वराज्यसेवेखातर दाखवलेला कर्तव्यकठोर निर्धार व अकल्पित शौर्य.प्रेरणा,लढाऊ बाणा,चिकाटी,बलिदान,उत्साह व स्वराज्यनिष्ठेचा ह्या निर्मळ प्रवाहात आकंठपणे अभ्यंगस्नान करूनच आयुष्याच्या संग्रामपटलावर आपण यशस्वी वाटचाल करू शकू.

इ.स.१६४९ मध्ये अफझलखानाचा स्वराज्यकार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा डाव छत्रपतींनी राजकारणाचे व वेळकाढूपणाचे अस्त्र प्रभावीपणे वापरून उधळून लावला.स्वराज्यविरोधी आदिलशाही कारवाया यादरम्यान काहीश्या थंडावल्याने महाराज स्वराज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत लक्ष घालण्यास मोकळे झाले.बाजी पासलकर स्वराज्यरक्षणासाठी लढता लढता पुरंदर मोहिमेत धारातीर्थी पडले असता त्यांच्या इच्छेनुरूप महाराजांनी मोसे खोऱ्याची देशमुखी कृष्णाजी पासलकरांच्या नावे केली.कृष्णाजी पासलकरही लवकरच स्वर्गवासी झाल्याने साबाजी पासलकर व धर्माजी पासलकर ह्या द्वयीमध्ये मोसेखोऱ्याचा देशमुखीवरून घनघोर तंटा सुरु झाला.यवनी आक्रमणाच्या संकटाची तलवार सदैव डोक्यावर टांगती असताना अंतर्गत हेवेदावे व दुफळीमुळे स्वराज्याच्या एकीकृत शक्तीस निर्माण होणारा धोका ओळखून शिवाजी महाराजांनी इ.स.१६५१-१६५२ च्या सुमारास गोतसभा बोलवून स्वतः जातीने मोसे खोऱ्याच्या देशमुखीचा निवाडा केला.रोहिडखोऱ्यातील केदारजी बिन नरसोजी व खंडोजी बिन धर्मोजी खोपडे देश्मुखांमध्ये असलेला वतनदारीचा तंटाही मिटवला.यवनी आक्रमणापासून लाभलेला उसंतीचा काळ प्रभावीपणे वापरून  वर्धिष्णू स्वराज्यशक्ती  बळकट करण्याच्या निर्धाराने छत्रपती तडफेने कामास लागले.स्वराज्यावर येणाऱ्या भावी राक्षसी संकटांच्या निकराच्या सामन्यासाठी जणू हा पूर्वतयारीचा काळ होता.एकीकृत व समर्थ स्वराज्याची शक्ती स्वराज्याच्या पाठीशी उभी करण्यासाठी चोख राज्यकारभार,प्रखर न्यायव्यवस्था व लोकाभिमुख धोरणांचा अवलंब शिवछत्रपतींनी मुत्सद्यांच्या मदतीने नव्या उभारीने सुरु केला.नवीन सैन्यसंचणी करून स्वराज्याचे लष्करी सामर्थ्य वाढवले.शस्त्रसाठा वाढवून स्वराज्याचे शस्त्रागार सुसज्ज व अद्यावयत केले.श्रींची इच्छा असलेल्या हिंदवी स्वराज्याचा अभ्युदय व्हावा व उत्तरोत्तर उन्नती व्हावी अशा दैवी विचाराने पछाडलेले शिवछत्रपती देवब्राह्मणांना साकडे घालत होते.कर्तव्यकठोरपणे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता हिंदवी स्वराज्याची लोककल्याणकारी धोरणे राबवणारे शिवछत्रपती सत्पुरुशांसमोर नम्र होत होते.”सुर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते” श्रीमहाबळेश्वरचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधरभट ह्यांच्याकडून छत्रपतींनी स्वराज्यवृद्धीसाठी मंत्र उपदेश संपादिला,तसेच “आपल्या अभ्युदयार्थ स्वामींनी सुर्यानुष्ठान करावे” अशी विनंती महाराजांनी त्यांना करून गोपाळभटांना इ.स.१८ फेब्रुवारी १६५३ च्या पत्रातील नोंदीनुसार वर्षासनही नेमून दिले.चाकणच्या सिद्धेश्वरभट ब्रह्मे ह्या सत्पुरुशावरही महाराजांची श्रद्धा होती.”त्यांच्या अनुष्ठानबळेच आपण राज्यास अधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो” असा विश्वास असल्याने व संकटसमयी सिद्धेश्वरभटांनी हात दिल्याने त्यानाही महाराजांनी इ.स.१७ ऑगस्ट १६५३ रोजी वर्षासन नेमून दिले.हिंदवी स्वराज्यस्वप्न प्रत्यक्षात उतरवून जगवण्यासाठी छत्रपतींचे प्रभावी व चोख कारभारासोबतच आशीर्वादाचे पाठबळ उभे करण्याचे चौफेर प्रयत्नच वरील प्रसंगातून ध्वनित होतात.

हिंदवी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी छत्रपतींच्या कर्तबगारीसोबतच असलेले जिजाऊमातेचे योगदानही दुर्लक्षून चालणार नाही.छत्रपतींच्या कर्तुत्व व विचारसामर्थ्याला जिजाऊरुपी त्रिदेवीसंगम दैवी शक्तीचा मोठा आधार होता.दस्तुरखुद्द जिजाऊमाता स्वराज्याच्या कारभारात करडी नजर ठेवून लक्ष घालीत होत्या.गणो गबाजी तबीब ह्याला पुणे परगण्यातील मौजे बेहरवडे येथील जमीन शहाजीराजे व महाराजांकडून इनाम मिळालेली होती.काही कारणाने २४ मे १६५१ ते २३ मे १६५२ दरम्यान शिवाजी महाराजांनी एका खुर्दखतानुसार त्याचे इनाम अमानत केले.आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होऊन गणो तबीब तक्रार घेऊन निवाड्यासाठी जिजाऊबाईसाहेबांकडे आला.गणो तबिबाची जबानी पटल्याने त्यांनी “चिरंजीव राजेश्री सिउबाचे खुर्दखताचा उजर न करणे” असे स्पष्ट शब्दात लिहून त्याचे इनाम त्याला परत केले.जिजाऊंचे अघाढ पुत्रप्रेम स्वराज्यकार्याच्या,न्यायाच्या व चोख कारभाराच्या मुळीच आड आले नाही असा निष्कर्ष वरील घटनेवरून निघतो.जिजाऊंच्या न्यायी बाण्याची,प्रभावी निवाड्याची व संमोहित करून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाची प्रचीतीही आपल्याला येते.शिवछत्रपतींच्या महात्कार्याचा गाभा संपूर्णपणे जिजाऊंच्या त्यांच्यावरील संस्कारशक्ती व विचारशक्तीने बनला आहे असे ध्यानी येते.जेजुरीच्या गुरव पुजाऱ्यांच्या झगड्याचा निवाडाही जिजाऊमातांनीच केला.हिंदवी स्वराज्याच्या प्रभावी लोकाभिमुख व्यवस्थेवर असलेली जिजाऊंची छाप ऐतिहासिक पुराव्यांतून ठायी ठायी दिसून येते.छत्रपती व जिजाऊंचा हा सारा आटापिटा हिंदवी स्वराज्य हे कसे यवनी पादशाहीपेक्षा संपूर्णपणे वेगळे,आपलेसे वाटणारे,लोकाभिमुख,न्यायनिष्ठीत व लोककल्याणकारी आहे हे समाजमनावर बिंबवण्यासाठी सुरु होता.सामान्य रयत जर मायेच्या सूत्रात बांधली गेली तर स्वराज्यावर येणाऱ्या कुठल्याही संकटाचा निर्धाराने सामना करून एकीकृतपणे विजयी होईल ह्या विचारावर संपूर्ण निष्ठा असल्यानेच छत्रपतींनी लोकाभिमुख धोरणे प्रभावीपणे राबवली.किंबहुना चोख राज्यव्यवस्थाच एकप्रकारे संकटांच्या द्रोहपर्वातून हिंदवी स्वराज्याच्या दैदिप्यमान समुत्कर्षाचे कारण ठरली.

इ.स.१६४९ नंतर छत्रपतींनी लोकाभिमुख राज्यकारभाराची चोख व्यवस्था लावून सामान्य रयतेच्या मनात हिंदवी स्वराज्याविषयी आपुलकी व आस्था निर्माण करण्याचे प्रयत्न हिरीरीने केले.कैदेतून सुटका झाली असली तरीही शहाजीराजे इ.स.१६४९ पासून विजापुरातच असल्याने महाराजांचे हात स्वराज्यविस्तारासाठी बांधले गेले होते.छत्रपतींची ३-४ वर्षे प्रभावी राज्यव्यवस्था निर्माण करण्यात निघून गेली असली तरीही शहाजीराजे विजापुरात असेपावेतो स्वराज्यसीमा विस्तारणे शिवछत्रपतींना शक्य नव्हते.मुहम्मद आदिलशाहची प्रकृती अस्वस्थ असल्याने आदिलशाही दरबारात दोन पक्षांमध्ये सत्तास्पर्धेला दरम्यानच्या काळात ऊत आला होता.खानमहंमदाच्या पक्षाचे शहाजीराजे,फतहखान व मलिक याकूत हे बादशाहशी निष्ठेने वागत होते तर दुसऱ्या पक्षाची सूत्रधार बडी बेगमसाहिबा उर्फ ताज-उल-मुक्खद्दीरत आपल्या चालीने आदिलशाही कारभार चालवू इच्छित असल्याने दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्पर्धा व शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत येऊन आदिलशाही अन्त्यस्थरित्या खिळखिळी होऊ लागली.अशातच दक्खनची मोगल सुभेदारी शहजादा औरंगजेबला मिळाली व दक्खनेत येऊन औरंगाबादला तळ ठोकताच औरंगजेबाने औरंगी कपटनीतीचा आरंभ केला.अत्यंत कपटी,दगाबाज व अतिमहत्वाकांक्षी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या औरंग्याचे पाय दक्खनभूमीला लागताच दक्खनेचे राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली.आदिलशाही व कुतुबशाही खालसा करून मोगली सल्तनतचा परचम दक्षिणेपर्यंत भिडवण्याच्या इर्षेने औरंगजेबाने बुद्धीबळातील अश्वाप्रमाणे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.कुतुबशाहीतील कर्तुत्ववान व पराक्रमी सरदार मीर जुमला उर्फ महम्मद सय्यद ह्यास फितूर करून औरंगजेबाने कुतुबशाहीला पहिल्याच दणक्यात मोठा हादरा दिला.प्रचंड सैन्यशक्ती व औरंगजेबाच्या पाठबळावर मीर जुमला रावणाचे रूप घेऊन अवघ्या दक्षिणेत थैमान घालू लागला.कुतुबशाहीला धाब्यावर बसवून आदिलशाही मुलुखातही मीर जुमल्याने औरंगजेबाच्या आशीर्वादाने उत्पात सुरु केला.औरंगजेबाशी सख्य करून अवघा दक्षिणप्रांत आपल्या घशात घालण्याचे दुःस्वप्न मीर जुमला बघू लागला.दक्षिणेत मीर जुमला डोईजड होत चालल्याचे बघून आदिलशाहने खान महम्मदाला मीर जुमल्याच्या बंदोबस्तासाठी पाठवले.पण मीर जुमल्याने चांगलाच पराक्रम गाजवून हळूहळू आदिलशाही प्रांतात घुसून थेट शहाजीराजांच्या बंगरूळ प्रांताला आपली सीमा भिडवली.मीर जुमल्याच्या बंदोबस्ताची तातडीची गरज ओळखून इ.स.१६५५ मध्ये आदिलशाहने शहाजीराजांची रवानगी पुन्हा कर्नाटक प्रांतात केली.आदिलशाही हुकुमानुसार शहाजीराजे कर्नाटक मोहिमेवर कूच झाल्याने महाराजांवर स्वराज्यविस्तारासाठी असलेले बंधन नाहीसे झाले आणि जणू चाणक्याच्या सार्वभौम स्वराज्यतडफेने शिवछत्रपती स्वराज्यविस्तारासाठी योजना आखू लागले.

शहाजीराजांची कर्नाटक प्रांताची रवानगी होताच स्वराज्यविस्तारासाठी छत्रपतींची नजर जावळीवर खिळली.हिंदवी स्वराज्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेला लागुनच चंद्रराव मोऱ्यांची जावळी अजिंक्यपणाच्या दिमाखात उभी होती.मोरे घराणे हे आदिलशाहीचे जावळीचे पिढीजात जहागीरदार होते.८-१० पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव कुबेराचे डोळे दिपून जावे एवढे वाढवले होते.मोरयांकडे १०-१२ हजार फौज होती.महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी मुलुख व सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता.जावळीसारख्या मोक्याच्या जागी असलेल्या सत्तेमुळे वाईचा सुभा,सह्यान्द्रीमंडळ आणि पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर मोरे आपली सत्ता गाजवीत.कोकण व घाटमाथ्यातील मोक्याचे सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.जावळीच्या समर्थ सत्ताधीशांशी मित्रत्वाचे फायदे ओळखून छत्रपतींनी इ.स.१६४७ मध्येच माणकाईने दत्तक घेतलेल्या कृष्णाजी बाजी चंद्ररावास विजापूरच्या नाराजीचा धोका पत्करूनही जावळीच्या गादीवर प्रस्थापित केले.छत्रपतींच्या उपकाराने  चंद्रराव गादीवर आला असला तरी छत्रपतींच्या स्वराज्यकार्याने व हिंदवी स्वराज्यविस्ताराने चंद्ररावाने महाराजांशी उघडपणे शत्रुत्व आरंभले.हिंदवी स्वराज्य वाढीस लागल्याने चंद्रारावच्या स्वराज्यविस्ताराच्या लालसेस पायबंद बसत होता.नवख्या पण सामर्थ्यशाली हिंदवी स्वराज्याचा पुरातन,अभिमानी व अहंकारी जावळीच्या सर्वसत्ताधीशांसोबतचा हा निकराचा संघर्ष होता.हिंदवी स्वराज्य कार्यास पायबंद घालण्यासाठी चंद्रराव मोऱ्यानी कपटनीती व दडपशाहीचे सत्र आरंभले.इ.स. १६५५ पर्यंत शहाजीराजे विजापुरातच असल्याने व मोरे घराणे आदिलशाहीचे परंपरागत मात्तबर वतनदार असल्यानेच महाराजांना मोऱ्याविरुद्ध उघड हालचाल करणे शक्य नव्हते. इ.स. १६५५ मध्ये शहाजीराज्यांच्या कर्नाटक रवानगी नंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. स्वराज्याच्या विस्तारासाठी असलेले महाराजांवरचे बंधन ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाहीसे झाले. डोईजड होत चालेल्या मोऱ्याचा पक्का बंदोबस्त करण्याची खुण-गाठ बांधून निश्चयाचा महामेरू राजा शिवछत्रपती तडफेने बेत आखु लागला. ६ वर्षांच्या शांततापर्वात हिंदवी स्वराज्याच्या वृधिंगत केलेल्या सामर्थ्याच्या कसोटीचा आता आरंभ होणार होता. कर्तुत्वतेजाने तळपणारे नवेशिके हिंदवी स्वराज्य आत्ता बलाढ्य, सत्तारुपी मुळे जमिनीत घट्टपणे रुजवून बसलेल्या, सैन्य तसेच धनशक्तीने सामर्थ्यवान मोऱ्याशी निकराची झुंज देणार होते. छत्रपतींच्या सर्वश्रुत असलेल्या व समस्तास भावणाऱ्या विजयपर्वाचा आत्ता आरंभ होणार होता. ५-६ वर्षांच्या स्थैर्याने, छत्रपती व मुसात्द्यांच्या चोख कारभाराने व जिजाऊमातेच्या निवाड्याने तसेच भरभक्कम आशीर्वादाने पुरंदरच्या रणसंग्रामात परमतेजाने तळपलेला हिंदवी स्वराज्याचा कोहिनूर आता राज्यव्यवस्थेच्या तसेच सामान्य रयतेच्या सकळसुखाच्या कोंदणातही “न भूतो न भविष्यति” असा झळाळून यवनी पादशाहींचे डोळे दिपवत होता.      

जय भवानी !!!!! जय शिवराय !!!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,

अमरावती.              

No comments:

Post a Comment