शिवाजी !!! हे तीन शब्द कानी पडताच मनाचे वारू चौफेर उधळतात, रक्तधमन्या ताठ होऊन
आत्म्यास शौर्याचे बाळसे चढते, दिग्विजयी पराक्रम
करण्यासाठी बाहू फुरफुरू लागतात, समस्त हिंदूंचा
मानबिंदू असलेला भगवा झेंडा अवघ्या विश्वात नाचवण्याची अभिलाषा बळ धरू लागते, आम्हा
सर्वसामान्यांच्या आत्म्यास पुनर्जन्माचे वेध लावणारे कोण हे शिवाजी ???
काय ऋणानुबंध त्यांचा नी आमचा ????
अकल्पितपणे वरील प्रश्नाच्या उत्तराचा घंटानादाप्रमाणे लयबद्ध समर्पक उद्घोष
मनात सुरु होतो. सर्वसामान्य ते
असामान्यत्वाचा प्रवास घडवणारा श्रीमंत योगी म्हणजे शिवाजी, मृतप्राय झालेल्या हिंदूंच्या स्वाभिमानास पुनश्च
गगनचुंबी उभारी देणारा परमवीर म्हणजे शिवाजी, गुलामीचे डोंगर
फोडून वाट काढणारा निर्मल जलप्रवाह म्हणजे शिवाजी, अत्याचाराच्या अग्निदाहाचे शमन करणारा वायुदूत म्हणजे शिवाजी, उदधीच्या बेलगाम लाटांस झेलून रोखणारा किनारा म्हणजे
शिवाजी, यवनसत्तेच्या लंकेस मनगटाच्या बळाने आणि तलवारीच्या
टोकाने होरपळून काढणारा हनुमंत म्हणजे शिवाजी, हिंदवी स्वराज्याचा गोवर्धन करंगळीवर तोलून समस्त रयतेस मायेची सावली देणारा
श्रीकृष्ण म्हणजे शिवाजी, रावणस्वरूप यवनांचे
मर्दन करून धर्माची पुनर्स्थापना करणारा मर्यादापुरुषोत्तम म्हणजे शिवाजी, फसव्या मायावी रात्रीयुद्धात अधर्मी कौरवांप्रमाणे
असलेल्या यवनांवर काळ बनून कोसळणारा घटोत्कच म्हणजे शिवाजी, अन्यायाच्या
समुद्राचे पराक्रमी आचमन करणारा अगस्ती म्हणजे शिवाजी, क्रौर्याचे व अह्वेलनेचे चक्रव्यूह फोडणारा महारथी
अभिमन्यू म्हणजे शिवाजी, परवशतेचे हलाहल
पिऊन सार्वभौमत्वाची नवी पहाट देणारा महादेव म्हणजे शिवाजी. शिवछत्रपती आणि आपला ऋणानुबंध हा जन्मजन्मांतरीचा आहे. शिवचरित्राचे सखोल अध्ययन करून आपल्याला तो मनात खोलवर रुजवायचा आहे.
इ.स. १६४४ साली अफझलखानाच्या कटावामुळे आदिलशाहने शहाजीराजांच्या पुणे
परगण्याच्या जप्तीचे आदेश काढले आणि हुकुमाच्या तालीमीची जबाबदारी खंडोजी व बाजी
घोरपडे कापशीकर ह्या द्वयींवर सोपवली. पुणे प्रांताची
नासाडी टाळण्यासाठी उघड संघर्षाचे धोरण शिवछत्रपती व दादोजींनी टाळले आणि पुणे
परगणा घोरपड्यांच्या स्वाधीन झाला. उघड संघर्ष टाळून
रोहिरेश्वर डोंगराच्या आश्रयाने लढण्याचा निर्धार करून शिवाजी महाराज आपल्या
सवंगड्यांसह रोहिरेश्वराच्या देवालयात आले. हिंदवी
स्वराज्यनिर्मितीचा संकल्प मनात पक्का करून स्वराज्यस्थापनेची शपथ जीवाला जीव
देणाऱ्या सवंगड्यांसहित रायरेश्वराच्या साक्षीने शिवाजी महाराजांनी वयाच्या १४व्या
वर्षी घेतली.
शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली अशी
सर्वसाधारण धारणा आहे. James grant duff ह्या इंग्रजी इतिहासकाराने चिटणीस बखरीच्या आधारे तसे विधान केल्याने हा समज
जनमानसात रूढ झाला. Grant duff सोडता इतर कोणतेही शिवचरित्र आणि समकालीन पुरावे तोरणा गड जिंकून हिंदवी
स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केल्याचे ध्वनित करत नाहीत. इ.स. १६४६ च्या
बऱ्याच आधी छत्रपतींची पाऊले हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या दिशेने पडत होती असे विविध
ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध होते. इ.स. १६४२ मध्ये
बंगरूळहून पुणे परगण्यात परतल्यानंतर बारा मावळखोरी संघटीत करण्याच्या प्रयत्नासच
स्वराज्यस्थापनेचे पहिले पाऊल समजावे लागेल. बंगरूळहून परतल्यानंतर बारा मावळखोरी संघटीत करताना ढमाले देशमुखांकडून
कवारीगड दादोजींनी घेतल्याची नोंद सापडते, तसेच इ.स.१६४२-१६४३
मध्ये राजगड हा बेवसाउ किल्ला छत्रपतींच्या नावाने दादोजींनी ताब्यात घेतल्याचे
दाखले आढळतात. Grant duff व चिटणीस बखरीने
मूळ इतिहासाच्या मांडणीऐवजी तोरणा गडाचा दावा उचलून इतिहासाला सनसनाटी स्वरूप
देण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे शिवाजी महाराजांनी आणि दादोजींनी इ.स.१६४२ ते
१६४६ मध्ये केलेली बारा मावळखोरी संघटनासारखी अनेक मोलाची कार्ये बरीच झाकोळली
गेली. शिवछत्रपती
परिपूर्णपणे समजून घेण्यासाठी इतिहास शास्त्रशुद्ध ऐतिहासिक संशोधनाने त्याच्या
मूळ स्वरुपात मांडणे अगत्याचे आहे.
रायरेश्वरास हिंदवी स्वराज्यशपथेनंतर महाराज विद्युतवेगाने स्वराज्यकार्यास
लागले. राजगडी १००० - १२०० मावळ्यांचा
जमाव जमवून शिवाजी महाराजांनी रोहिड्यावर निकराचे आक्रमण केले आणि रोहिड्याचे
पादशाही ठाणे उडवून लावले. हिंदवी स्वराज्याची
ध्वजपताका रोहिड्यावर डौलाने फडकू लागली. चांदसिताऱ्याच्या
ध्वजसागरास जणू दंड थोपटून मल्लयुद्धाचे आव्हान देऊ लागली. पुणे प्रांत घोरपडे सरदारांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्याचदरम्यान
शिवाजी महाराजांनी लढाऊ कडव्या मावळ्यांच्या व चतुर मुत्सद्यांच्या मदतीने
रोहिडा-राजगडदरम्यानचा,रोहिड्खोरे आणि वेलवंडखोऱ्यातील जुना निजामशाहीचा प्रदेश जिंकून घेण्यास
सुरुवात केली. पुणे प्रांतात
घोरपडे सरदारांविरुद्ध आघाडी उघडून गनिमी काव्याने घोरपड्यांचा अंमल बसू दिला
नाही. शिवाजी आणि दादोजी
कोंडदेवांनी मायेने जोडलेले बाजी पासलकर,कान्होजी जेधे इ. भारदस्त वतनदार हिरीरीने स्वराज्यकार्यात भाग घेत होते.
शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याच्या दिशेने पाऊले पडत असताना इ.स.१६४४
च्या आरंभीपासूनच शहाजीराजे विजापुरास होते. कर्नाटक मोहिमेत फितव्याच्या आरोपावरून कसून चौकशीअंती शहाजीराजांचे
निर्दोषत्व सिद्ध झाले आणि आदिलशाहने शहाजीराजांचा यथोचित सन्मान करून त्यांची ५
लक्ष होनांची बंगरूळची जहागीर शहाजीराजांना परत केली. नवाब मुस्तफाखानाच्या चिथावणीनेच अफझलखानाने शहाजीराजांना फसवण्याचा कट रचला,त्यामुळे आदिलशाहची
मुस्तफाखानावर खफामर्जी झाली आणि मुस्तफाखानाला आदिलशाहने दस्त करून बेळगाव
जिल्ह्यात ठेवले. सुमारे महिनाभर
मुस्तफाखान बेळगावच्या कैदेत होता.इ.स. एप्रिल-मे १६४५ च्या सुमारास आदिलशाह व
शहाजीराजांमध्ये दिलजमाई झाली. इ.स. १६४५ च्या
पावसाळ्यानंतर आदिलशाहने परत खानखानानच्या नेतृत्वाखाली कर्नाटक मोहिम उघडली आणि
आदिलशाहने शहाजीराजांची रवानगी कर्नाटक मोहिमेवर केली. कर्नाटक मोहिमेत आदिलशाहीला प्रचंड यश लाभून पाठोपाठ ९ किल्ले शहाजीराजांसमवेत
आदिलशाही सरदारांनी काबीज केले, त्यामुळे
आदिलशाहच्या मनातील शहाजीराजांविषयीचे किल्मिष पूर्णपणे दूर झाले. शहाजीराजांच्या
निष्ठावान चाकरीस्वरूपी इ.स. १६४५ च्या अखेरीस दादोजी कोंडदेवांवर पुन्हा पुणे
परगण्याचा कारभार सोपवण्यात आला. राजगड, तोरणा इ. महाराजांनी ताब्यात घेतलेले किल्लेही “बंदोबस्तासाठी” शिवाजी
महाराजांच्या ताब्यात ठेवण्यात आले.
इ.स.१६४४-१६४५ ह्या २ वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वास
बहुरूपी आयाम लाभले. हिंदवी
स्वराज्याच्या मनातील आराखड्यांना अनुभवाची जोड मिळून छत्रपतींची विचारशीलता आणि
योजनाशक्ती अधिक सुदृढ झाली. ज्या पुणे परगण्यात
स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली होती त्या परगण्यात आपला मित्र कोण आणि अंत्यस्थ शत्रू कोण ह्याचा
बहुमुल्य अनुभव मिळाला. घोरपडे
सरदारांविरुद्ध वापरलेले गनिमी काव्याचे महत्व छत्रपतींच्या मनावर कायमचे ठसले. मर्यादित
शक्तीसामर्थ्य असूनही महाबलाढ्य पादशाहीचा मुकाबला आपण दुर्गम,दुर्दम्य अश्या
निसर्गदाटीचा प्रभावी अस्त्र म्हणून वापर करून करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण
झाला.
इ.स.१६४५ च्या आसपासच शिवाजी महाराजांनी स्वतंत्रपणे स्वराज्याचा कारभार व
न्यायनिवडा करणे सुरु केल्याचे आढळते. रांझे गावाची
पाटीलकी बावाजी गुजराकडे होती. रांझेकर पाटील
बावाजी गुजराकडून काही कारणाने बदअंमल झाल्याचा करीणा छत्रपतींच्या कानावर गेला. महाराजांनी स्वतः
केलेल्या निवाड्याअंतर्गत रांझेकर पाटलाचा दोष सिद्ध झाला आणि पाटलाचे हात-पाय कलम
करण्याची शिक्षा महाराजांनी ठोठावली. रांझेकर पाटील
निपुत्रिक होता, त्यामुळे रांझेकर पाटलाच्या पालनपोषणाची व्यवस्था
सोनजी गुजरावर सोपवून महाराजांनी सोनजीस रांझे गावची पाटीलकी दिली. रांझेकर पाटीलाच्या
निवाड्याने महाराजांच्या कर्तव्यकठोर न्यायासोबतच त्यांच्या ठायी असलेली दयाशीलता
व प्रजावत्सलता अधोरेखित होते. न्याय व
निष्ठुरतेमधला फरक शिवाजी महाराजांनी रांझेकर पाटीलला शासन करण्यासोबतच त्याच्या
उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून दाखवून दिला. रांझेकर पाटलाच्या
निवाड्यातून छत्रपतींच्या समतोल बुद्धीचा परिपूर्ण परिचय आपल्याला होतो.
इ.स. १६४६ साली दादोजी कोंडदेव शहाजीराजांच्या भेटीसाठी कर्नाटक प्रांती
गेल्याच्या दाखला आढळतो. इमान, निष्ठा व चिकाटीने भोसले कुळाची सेवा करणाऱ्या दादोजी
कोंडदेव गोचिवडेंचे आता वय झाले होते. १२ मावळ प्रांताची
वर्धिष्णू शक्ती दादोजींनी छत्रपतींच्या पदरी बांधली होती. छत्रपतींच्या सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्व विकासामागे असलेले दादोजींचे
योगदान दुर्लक्षून चालणार नाही. छत्रपतींचे
पुंडाईचे (स्वराज्यनिर्मितीचे)
धोरण दादोजींना फारसे पसंत नसले तरी ह्यामागचे कारण हे गुलामी मानसिकता मुळीच नसून
शिवबांच्या काळजीपोटी त्यांची त्याला नापसंती होती. शहाजीराजांची भेट घेऊन जीवघेणा आजार घेऊनच दादोजी दक्खनेत परतले आणि इ.स. ७
मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला.
दादोजींच्या मृत्यूने वयाच्या अवघ्या १७-१८व्या वर्षी स्वराज्याची संपूर्ण
जबाबदारी महाराजांच्या खांद्यावर पडली. पैलू पाडल्याने जसे
हिऱ्याचे स्वरूप तेजाने आणि सौंदर्याने झळाळून निघते तसेच कर्तबगार पुरुषाच्या
कर्तुत्वाची चुणूक पुरुषाच्या अंगावर जबाबदारी पडल्यावरच बघयला मिळते. दादोजींच्या
आजारपणातच विजापूरचा मुहम्मद आदिलशाहही गंभीर दुखण्याने आजारी पडला आणि आदिलशाहीची
संपूर्ण सूत्रे बडी बेगमसाहिबाच्या हाती एकवटली. तत्पूर्वीच वजीर मुस्तफाखानाच्या नेतृत्वाखाली मोठी फौज कर्नाटकात रवाना झाली
होती. शहाजीराजांच्या
पराक्रमाने आणि आदिलशाहीची मोठी फौज कर्नाटकात गुंतल्याने स्वराज्यास काहीशी
अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. ह्या अनुकूल
परिस्थितीचा लाभ हिंदवी स्वराज्यासाठी उठवण्याचा निर्धार शिवाजी महाराजांनी मनात पक्का केला आणि विश्वाला गवसणी
घालण्याच्या ईर्षेने पंख पसरून हिंदवी स्वराज्यरूपी गरुडाने पारतंत्र्याच्या
घरट्यातून स्वतंत्रतेच्या आकाशात उत्तुंग गरुडभरारी घेतली.
जय भवानी !!!! जय
शिवराय !!!!
चैतन्य देशपांडे
शिवशौर्य
प्रतिष्ठान,
अमरावती.