Thursday, 19 May 2016

बारा मावळचे शिलेदार व स्वराज्याची नांदी ....

     आज अनेक राष्ट्रपुरुषांच्या चरित्राचा तर्कसंगत अभ्यास केल्यावर असे ध्यानी येते की शिवचरित्र हे विविध राष्ट्रपुरुषांच्या स्फूर्तीदायी कार्याची जीवनज्योती आहे.टिळक,सावरकरांसारखे अनेक राष्ट्रपुरुष शिवचरित्राचा अभ्यास करूनच राष्ट्रसेवेचा गर्भितार्थ मनात खोलवर रुजवू शकले.तसेच आपल्यालाही उद्याचे लाखाचे पोशिंदे उभे करण्यासाठी शिवचरित्र हे एक प्रभावी साधन आहे.”शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी” ह्या बौद्धिक विकृतीस फाटा देऊन आता “शिवाजी जन्मावा तो घरोघरी” अश्या वैचारिक निर्धारास बळ द्यायचे आहे.शिवछत्रपतींची डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी असंख्य रूपे शिवचरित्रकारांनी महत्प्रयासाने चितारली आहेत,ह्या चरित्रांच्या परिपूर्ण अभ्यासानेच आपण नवयुवकांमध्ये राष्ट्राचेतनेचा खळखळणारा समुद्र निर्माण करू शकू.

     धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात शिवछत्रपतींचे स्मरण करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
                           
शिवरायांचे आठवावे रूप  | शिवरायांचा आठवावा प्रताप  ||
शिवरायांचा आठवावा साक्षेप  | भूमंडळी  ||
शिवरायांचे कैसे बोलणे  | शिवरायांचे कैसे चालणे  ||
शिवरायांचे सलगी देणे | कैसे असे  ||

     मराठी घरात जन्म घेऊनही मराठी सोडून इतर भाषांवर प्रभुत्व असलेल्या शिवभक्तांसाठी ह्याचा मतितार्थ असा की,

“Remember how he was..Remember what he achieved..Remember his valour..Remember how he thought..While on this earth..Remember his glorifying persona..Remember how he walked Remember how he talked..Remember how dearly he loved his people”


     शिवछत्रपतींच्या धर्मकार्याचे व परिपूर्ण स्वरूपाचे स्मरण छत्रपती संभाजीना करून देऊन नवउत्साहाने हिंदवी स्वराज्याचे दैवी कार्य करण्याचा उपदेश समर्थ संभाजीराजांना करतात.समर्थांचा हा समर्पक उपदेश आजही आम्हास तंतोतंत लागू पडतो.शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व नुसते अभ्यासून नव्हे तर अंगीकारून स्वातंत्रोत्तर पावनपर्वात भारताला विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न बघणारे राष्ट्रपुरुष तुमच्या-आमच्यातूनच घडतील.

     इ.स. मे १६४२ च्या सुमारास शिवछत्रपती स्वतंत्र ध्वज,पेशवा,अनुभवी मुत्सद्दी,सैन्य व धनसंपत्तीसह बंगरूळहून पुणे प्रांतास परतले.कर्तबगार मुत्सद्द्यांची साथ लाभल्याने बाल शिवबा व दादोजी नवचेतनेने व सुदृढ आत्मविश्वासाने स्वराज्याकार्यास लागले.दादोजीपंतानी पुणे परगण्यात परतताच बारा मावळे काबीज केली असा सूचक उल्लेख सभासदाने केला आहे.पुणे जहागिरीत जी बारा मावळखोरी येतात ती पुढीलप्रमाणे आहेत १)अंदर मावळ २)नाणे मावळ ३)पवन मावळ ४)घोटण मावळ ५)मोसे मावळ ६)मुठे मावळ ७)गुंजन मावळ ८)वेळवंड मावळ ९)कर्यात मावळ १०)जुने मावळ ११)हिरडस मावळ १२)शिरवळ मावळ.भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम अश्या मावळ मुलुखाचे वर्णन करताना समर्थ लिहितात,”दरे शृंग पाठार मैदान दारी,कपारे गव्या विवरे ती भुयारी”.उंच बोडखे सुळके,मोकाट पसरलेली पठारे,गर्द झाडीची वने,नागमोडी वेडेवाकडे घाट व कातळ कडेकपाऱ्यानी नटलेला हा प्रदेश आहे.६ लक्ष फौजेचे चतुरंग सेनाबळ घेऊन हिंदवी स्वराज्य चिरडण्याच्या राक्षसी लालसेने दक्खनेत उतरलेल्या औरंगजेबास ह्याच सह्यांद्रीच्या कडेकपाऱ्यानी व दुर्लभ्य अश्या गडकोटांनी २५ वर्ष झुंजवत ठेवले.दक्खन जिंकण्याची अभिलाषा मनात घेऊन दक्षिणेत उतरलेला औरंगजेब सह्याद्रीच्या उत्तुंग,अभिमानी अश्या निसर्गदाटीसमोर व मराठी आत्मबळासमोर पराभूत झाला व इथेच संपला.स्वतंत्रतेच्या मराठी अस्मितेने औरंगजेबाच्या महात्वाकांक्षी सत्तालालसेला २५ वर्षे दिलेली झुंज ही शिवचरित्राइतकीच प्रेरणादायी व रोमांचक आहे.मराठ्यांच्या ह्या दैदिप्यमान संगरतांडवाचा अभ्यासही आपण यथावकाश करूच.

     मावळखोऱ्यात शेकडो वर्षांपासून मावळे देशमुखांची घराणी नांदत होती.अतिदुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे पादशाहीचे मावळ प्रांतावर असलेले प्रभुत्व हे नामधारी होते.मावळे देशमुख हेच मावळप्रांताचे खरेखुरे सर्वसत्ताधीश होते.प्रत्येक मावळखोरे हे देशमुखांच्या मुठीतील स्वयंभू व वर्धिष्णू शक्ती होती.वर्षानुवर्षाच्या सत्ताउपभोगाने आंडदांड बळजोरी मावळखोऱ्याच्या देशमुखांच्या अंगवळणी पडली होती.बारा मावळचे हे देशमुख अंतर्गत यादवीत एकमेकांच्या यथेच्च उखाळ्यापाखाळ्या काढीत.”बळी तो कान पिळी” असा मावळखोऱ्याचा शुद्ध न्याय होता.बारा मावळखोऱ्याची एकीकृत शक्ती आपल्या पाठीशी उभी केल्यास हिंदवी स्वराज्यनिर्मातीच्या स्वप्नास मोठे पाठबळ लाभेल हे बाल शिवबा,दादोजी व अनुभवी मुत्सद्द्यांनी ताडले.देशमुखांच्या स्वच्छंद बळजोरीस शह देऊन त्यांना धर्मकार्याच्या एका सुत्रात गोवण्याचे शिवधनुष्य दादोजींनी उचलले.साम-दाम-दंड-भेद ह्या कृष्णनीतीचा अवलंब करून बारा मावळचे देशमुख आपल्या बाजूने वळवण्याच्या कार्यास त्यांनी आरंभ केला.रामाजी चोरघे ठार केला.फुलाजी नाईक शिमळकर बांबूने ठोकून शरण आणले.कान्होजी जेधे देशमुखांचा थेट शहाजीराजांशी घरोबा असल्याने ते शिवबाराजे व दादोजींच्या पक्षाचे होते.दादोजींसमोर खरे आव्हान होते ते कृष्णाजी नाईक बांदालाचे.बांदल व जेधे देशमुख हे एकमेकांचे जन्मजन्मांतराचे कट्टर हाडवैरी होते.कृष्णाजी नाईक बांदल व कान्होजी जेधे ह्यांच्यातही संघर्षाची ठिणगी अनेकदा उडाली होती.जेध्यांनी एकदा महात्पराक्रम गाजवून बांदलाना नांदगावच्या संग्रामात नारमोहम केले होते,पण कृष्णाजी नाईक बांदलाने पुढील संग्रामात एका रणझुंजार सहकाऱ्याच्या मदतीने जेध्यांना परास्त करून कारी गाव लुटून फस्त केला होता.बांदलांचा तो रणझुंजार शिलेदार म्हणजे महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे शिवाजी महाराजांसाठी ४ प्रहर(१ प्रहर म्हणजे ३ तास) चिवट झुंज देऊन गजापुरची खिंड स्वतःच्या रक्ताने व बलिदानाने पावन करणारा बाजीप्रभू देशपांडे !!!!!!! काळ किती बलवान असतो बघा.एकमेकांचे कट्टर हाडवैरी हेच बांदल-देशमुख पुढील काळात खांद्यास खांदा लावून हिंदवी स्वराज्य वृद्धिंगत करण्यासाठी लढले.हिंदवी स्वराज्यासाठी मृत्युवेदीवर प्राणाचे बलिदान करून इतिहासात अजरामर झाले.

     कृष्णाजी बांदलाने बारा मावळखोरी जबरीने आपल्या ताब्यात ठेवली होती.कृष्णाजीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी हिरडस मावळावर आक्रमण केले पण कृष्णाजी व बाजीप्रभूंनी पराक्रमाची शर्थ करून दादोजींचा पराभव केला.अखेर दादोजींनी कान्होजी जेध्यांकडून कृष्णाजी बांदलास भेटीचा निरोप धाडला.त्यानुसार कृष्णाजी बांदल दादोजींना सिंहगडी येऊन भेटला.नानाप्रकारे मनधरणी करूनही कृष्णाजी बांदलाने आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने दादोजीपंतानी अखेर कृष्णाजी बांदलास कैद करून  त्याचे हात-पाय कलम केले व खऱ्या अर्थाने शिवबाराजांची बारा मावळावर सत्ता प्रस्थापित झाली.

     कान्होजी देशमुख जेध्यांप्रमाणे बारा मावळचे एक मातब्बर वतनदार मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर स्वराज्यसूत्राच्या जपमाळेत जुळले.बाजी पासलकर हे साक्षात कान्होजींचे श्वसुर होते.देशमुख-जेधे व पासलकरांच्या प्रभावाने हळूहळू सारी मावळखोरी महाराजांकडे रुजू होऊ लागली.कानद खोऱ्यातील झुंजारराव मरळ देशमुख,गुंजन मावळचे हैबतराव शिमळकर,खेडेबाऱ्याचे कोंडे देशमुख व मुठे खोऱ्यातील पायगुडे देशमुख असे सारे भारदस्त वतनदार दादोजी कोंडदेवांनी मायेनी स्वराज्यकार्यासाठी जोडले.दादोजींच्या दूरदृष्टीने व अनमोल कार्याने बारा मावळची अमोघ शक्ती शिवबांच्या पाठीशी स्वराज्यनिर्मितीसाठी उभी केली.

     मावळखोरी संघटीत करण्याचे अवघड कार्य संपन्न होताच दादोजी व शिवबांनी जहागीरीतील किल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले.भीमा व नीरा नदीमधील प्रदेश जहागीर म्हणून मिळाला म्हणजे फक्त मुलुख ताब्यात होता.पुरंदर,चाकण,तोरणा,राजगड,रोहिडा,सुभानमंगळ,कोंढाणा इ. असे सारे किल्ले आदिलशहाच्या नामजाद सुभेदारांच्या ताब्यात होते.किल्ल्यांचे महत्व हे मोकळ्या मुलुखापेक्षा जास्त होते.किल्ले ताब्यात घेणे म्हणजे सरळसरळ स्वराज्यनिर्मितीच्या कार्यास आरंभ करणे असा अर्थ होता.त्यामुळे शिवबा व दादोजींची पावले सावधगिरीने पडत होती,तरीही ढमाले देशमुखांकडून कवारीगड दादोजींनी घेतल्याची नोंद आढळते.

     सारी मावळखोरी एकसूत्रात गोवण्याचे शुभकार्य सुरु असतानाच इ.स.१६४३ मध्ये रणदुल्लाखानाच्या मृत्यूने शिवबा व शहाजीराजांच्या जीवनाला अनपेक्षित वळण लाभले.रणदुल्लाखान व शहाजीराजांचे घरोब्याचे संबंध होते.रणदुल्लाखान हा आदिलशाहीचा मातब्बर सरदार असल्याने त्याचा पक्ष इ.स. १६४३ पर्यंत आदिलशाही दरबारात प्रबळ होता,पण रणदुल्लाखानाच्या मृत्यूने शहाजीराजेविरोधी मुस्तफाखान,अफझलखान,बाजी घोरपडे इ. सरदारांचे फावले व शहाजी महाराजांबरोबर कर्नाटकात असलेल्या अफझलने चंदीच्या राचेवार मराठ्यांना शहाजीराजे फितूर असल्याची “बदगोह” आदिलशाहला कळवली.इ.स. ऑगस्ट १६४३ मध्ये आदिलशाहने शहाजीराजांना दरबारी हजर होण्याचे फर्मान काढले,तसेच पुणे जहागिरीच्या जप्तीचेही आदेश काढले.शहाजीराजांनी हुकुमाच्या तालीमीची टाळाटाळ आरंभिली व इ.स.१६४४ च्या आरंभीच ते विजापुरास निघून आले.

     पुणे परगण्याच्या जप्तीस आदिलशाहने खंडोजी व बाजी घोरपडे कापशीकर ह्यास नामजाद केले.स्वराज्य संस्थापनेस आदिलशाहीचे हे आक्रमण तात्कालिक कारण ठरले.शिवछत्रपतींच्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूप घेऊ लागली होती.दादोजींचा चोख कारभार व माणसे जोडण्याची कला त्यांनी अंगीकारायला सुरुवात केली होती.जिजाऊमातेची प्रजावत्सलता व न्यायनिष्ठीत लोककल्याणकारी धोरणेही त्यांच्या मनावर ठसत होती.यावेळी महाराजांचे वय फक्त १४ वर्षे होते.बारा मावळची समर्थ शक्ती त्यांच्या पाठीशी उभी होती.बाजी पासलकर,कान्होजी नाईक जेध्यांसारखे अनुभवी मुत्सद्दी तसेच तानाजी व सूर्याजी मालुसरे,येसाजी व कोंडाजी कंक,सूर्यराव काकडे,बाजी जेध्यांसारखे जीवास जीव देणे साथीदार लाभले होते.

      घोरपडेंच्या आक्रमणाने पुणे परगण्याची नासाडी थांबवण्यासाठी उघडपणे संघर्ष देण्याचे धोरण दादोजी व शिवबांनी टाळले.पुणे परगणा घोरपड्यांच्या ताब्यात जाऊन त्यांनी त्रिंबकजी राजे ह्यांच्यावर कारभार सोपवला.रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाने घोरपडेंचा मुकाबला करण्याचे शिवछत्रपती व दादोजींनी ठरवले.छत्रपतींच्या आयुष्यातील बालपर्व संपून पराक्रमी नवपर्वाचा आरंभ होण्याचा हा काळ होता.मनात घर करून बसलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेस प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ जवळ आली होती.छत्रपतींच्या मनाला ३५० वर्षांच्या गुलामगिरीचे पाश तोडून टाकण्याची अनामिक ओढ लागली होती.अशा मनस्थितीतच राजे रोहिडखोऱ्यातील भोर तालुक्यात रायरेश्वराच्या शंभूमहादेवाच्या दर्शनास आले.गुलामगिरीचे बंध झुगारून हिंदवी स्वराज्याचा निर्धार मनात पक्का झाला व परकीय यवनी सत्ता भारतवर्षाच्या क्षितीजपटलावरून समूळ नाहीशी करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची भीष्मप्रतिज्ञा शिवछत्रपतींनी वयाच्या १४व्या वर्षी घेतली.३५० वर्षांच्या गुलामगीरीने जंगलेली हिंदुत्वाची तलवार छत्रपतींच्या स्वराज्यशपथेने नवतेजाने तळपू लागली.

जय भवानी !!!!!! जय शिवराय !!!!!!

चैतन्य देशपांडे
शिवशौर्य प्रतिष्ठान,
अमरावती

No comments:

Post a Comment